गुरुवार, १० जानेवारी, २०१९

भाई- व्यक्ती, की वल्ली!

भाई- व्यक्ती, की वल्ली

~ अमित कालेकर, 10 फेब्रुवारी 2019


काल 'भाई 2' (किंवा, भाई- व्यक्ती, की वल्ली: उत्तरार्ध) बघितला. पहिल्या भागापेक्षा चांगला आहे. (पहिलाही उत्तमच होता!) ह्या चित्रपटात प्रेक्षकांना इमोशनल केलंय खूप. 'बटाट्याची चाळ'चा जन्म आणि रंगमंचावरचा पुलंचा सहज वावर छान दाखवलाय. 'ती फुलराणी' आणि भक्ती बर्वे-सतीश दुभाषी दाखवलेत. दीप्ती लेले एकदम हुबेहूब भक्ती बर्वेच वाटते! 'आनंदवन', बाबा आमटे ह्यांचा खूप चांगला उल्लेख आहे. पुलं-सुनीताबाईंची भरीव मदत आणि तिथलं त्यांचं वास्तव्य! 'नाच रे मोरा' गाणं बघून डोळे पाणावले! सुनीताबाईंचा मोटार ड्रायव्हिंगचा एक अफाट पैलू आपल्यासमोर येतो! रसिक मित्र 'रामुभैय्या दाते' (प्रसिद्ध गायक अरुण दातेंचे वडील) त्यांच्या इंदोरच्या घरी पुलंना कुमार गंधर्वांसाठी बोलावताना दिसतात. आणि मग वसंतराव, भीमण्णा, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर (म्हणजेच चंपूताई) ह्यांची रंगलेली मैफल काय बहार आणते!👌पण कुमारांच्या 'अजुनी रुसुनी आहे' गाण्याने मजा नाही आणली. कुमारांचा आवाज आणि ह्या चित्रपटातल्या गाण्यातला आवाज ह्याची तुलना नाही होऊ शकत. एखादं गाणं ओरिजिनलच वापरलं असतं तर चाललं नसतं का? (कदाचित कुमारांचा आजारपणातून उठल्यानंतरचा थोडा खालावलेला आवाज म्हणून तसं केलं गेलं असू शकतं.) कुमार गंधर्वांच्या निधनाच्या बातमीचा प्रसंग परिणामकारक झालाय. 'सखाराम गटणे', 'बबडू' ही पुलंची व्यक्तिचित्रं छान डोकावलीत! बबडूचं चित्र गिरीश कुलकर्णीने मसससस्त उठवलं आहे. बाळ ठाकरे आणि पुलं वाद चांगला दाखवलाय.

पुलं प्रयाग हॉस्पिटलमध्ये आपल्यातून जाण्याचा प्रसंग हेलावून टाकतो. म्हणजे, प्रसंग साधाच घेतलाय, पण आपले इमोशन्स आपल्या डोळ्यात परत एकदा पाणी आणि हुंदका आणतात. दिनेश अमेरिकेतून येण्यासाठीच पुलं थांबले होते. तो सुनीताबाईंच्या भावाचा मुलगा आणि पुलंचा सर्वात लाडका (मानसपुत्रच).

सुधीर फडक्यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा उल्लेखही भाई (1 आणि 2) मध्ये नाही. (किंवा मी मिस केला का??) पुलंशी त्यांचं तितकं सख्य नव्हतं का? की वाद होता? तीच गोष्ट प्र. के. अत्रेंबद्दल. अत्रेंना निदान एका (छोट्या का होईना) प्रसंगात तरी दाखवलं आहे. सुनीताबाईंनी लेखकाच्या रॉयल्टीबद्दल सुरू केलेली मागणी / प्रथा योग्यच होती. त्याचा प्रसंग छान. त्यामुळे, आणि त्यांच्या काटकसरी स्वभावामुळं 'पुलं फाउंडेशन' कडे चांगली रक्कम साठत गेली, आणि त्याचा अतिशय योग्य विनिमय पुलं आणि सुनीताबाईंनी पुढील आयुष्यात असंख्य समाजसेवी संस्थांना देणग्या देऊन केला. पुलंनी 'NCPA' सारख्या ख्यातनाम संस्थेची स्थापना मुंबईत JRD टाटांसोबत केली. पुलं फाऊंडर मेंबर आणि डायरेक्टरही होते, पण त्याचाही उल्लेख टाळण्यात आलाय. पुलंची अफाट गाजलेली प्रवासवर्णनं (अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी) ह्यांचा उल्लेख चित्रपटात यायला हवा होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो खूप मोठा पैलू होता. 1977 च्या आणीबाणीनंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या प्रचारसभांतला पुलंचा सक्रिय सहभाग छान दाखवलाय. 'इरावती हर्षे'ने सुनीताबाईंच्या भूमिकेचं सोनं केलंय!👌 'सागर देशमुख'ने पुलं खूप मस्त उभे केलेत. अगदी शेवटच्या पुलंचा आवाजही त्याचाच. 

काल आम्ही सिटी प्राईड कोथरूड थिएटरमधून चित्रपट पाहून बाहेर पडताना 'भाई'चे दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यांच्या गाडीतून थिएटरमध्ये शिरले, तेंव्हा त्यांचं ओझरतं दर्शन आम्हाला घडलं!👍

अजून एक चित्रपटाचा भाग करून त्यात पुलंचे अजून थोडे पैलू दाखवता आले असते, तर छान वाटलं असतं. हा चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी नाही हे बरोबर आहे, पण काही प्रसंग हवे होते हे मात्र निश्चित. पण शेवटी दिग्दर्शक / निर्मात्याची इच्छा. अजून एक म्हणजे पुलं चा काळ 2000 पर्यंतचा. आज 18/19 वर्षानंतर काही पात्रांबद्दल लोकांना विस्मरण व्हायची शक्यता आहे. ते नीट समजण्यासाठी त्यांच्या एन्ट्रीला एकेक छोटंसं टायटल दाखवलं गेलं असतं तर बरं झालं असतं असं माझं आपलं मत.


माझं रेटिंग 3.5 / 5.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा